Saturday, March 12, 2011

हुस्नबानू व ढोंगी साधू

हुस्नबानू त्याप्रमाणे आपल्या जीवनातील दिवस घालवीत होती. एक दिवस रस्तावरील मौज खिडकीतुन ती पाहत होती. एक वृद्ध साधुमहाराज आपल्या शिष्यांसह रस्त्यावरून जाताना दिसला. त्याचे शिष्य त्याच्या मार्गावर सोन्यारूप्याच्या विटा ठेवीत होते. त्यावरून जमिनीला पाय न लावता साधुपुरूष चाललेला पाहून ती आश्चर्यचकीत झाली व तिने दाईस हा असा का चालला आहे असे विचारले.

तेव्हा दाई म्हणाली, ’बेटी, हा साधुपुरूष राजाचा गुरु आहे व त्याच्या भेटीसाठी तो जात आहे. कधी कधी राजसुद्धा त्याच्य दर्शनास जातो.’

नंतर बानूने दाईला विचारले की, ’आई!, तुझी परवानगी असेल तर या साधुपुरुषास आपल्या घरी बोलावून त्याचे दर्शन मी घेऊ का?’ तेव्हा ती म्हणाली, ’तुझी इच्छा असल्यास जरूर दर्शन घे.’

त्याप्रमाणे आपल्या चाकराकरवी हुस्नबानूने साधुस निरोप पाठविला की आपल्या चरणांची धूळ आमच्या घराला लावून आम्हाला पावन करावे अशी प्रार्थना आहे.

साधूने तिच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. दुस-या दिवशी येण्याचे मान्य केले. हुस्नबानूस अतिशय आनंद झाला. तिने त्या दिवशी संपूर्ण महाल शृंगारला. निरनिराळ्या प्रकारची उत्तमोत्तम पक्वान्ने तयार केली. प्रात:काळीच साधूला घेऊन येण्यासाठी चाकरास पाठवून दिले.

बाह्माचारी साधू असणारा तो इसम अत्यंत दृष्ठ व भयंकर नीच पातळीचा ढोंगी माणूस होता. दृष्ट कृत्ये करण्यास तो सरावला होता. त्याचे शिष्यसुद्धा पापकर्म करण्यात पटाईत होते. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की, त्याच्या पापांचा सुगावा कोणालाच लागत नसे. त्यामुळे राजाचीसुद्धा त्याच्या ठिकाणी श्रद्धा होती. राजादेखील त्याला पूज्य मानी.

साधूच्या स्वागतासाठी हुस्नबानूने सर्व वाडा सजविला, दिवाणखान्यात भरजरी बैठकी घातल्या. ठरलेल्या वेळी साधू आपल्या शिष्यांसह आला. बानूने त्याला आसनावर बसविले. मनोभावे त्याची पूजा केली. मौल्यवान जवाहि-यांची भरगच्च ताटे त्याच्यासमोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली. तेव्हा ती धनदौलत पाहून साधू शांतपणे म्हणाला, ’ही संपत्ती घेऊन मी काय करणार? मला त्याचा उपयोग का?’ साधूची ही वैराग्य वृत्ती पाहून बानूला त्याचेबद्दल अतिशय आदर वाटू लागला.

नंतर साधूला बानूने दुस-या दालनात नेऊन भरजरी पोषाख अर्पण केले. पण त्याने त्याचाही अंगिकार केला नाही.

त्यानंतर तिस-या दालनात बानू त्याला घेऊन गेली. तेथे मोत्याचे जाळीदार पडदे सोडलेले होते. हंड्या व झुंबरांनी तर फारच शोभा आली होती. सोन्यारूप्याच्या सुंदर ताटात त-हेत-हेचा चविष्ठ पक्वान्ने वाढून बानूने सर्वांपुढे ठेवून त्यांना प्रार्थना केली, ’महाराज! जवाहार व भरजरी पोषाख यांचा आपण स्वीकार केला नाही, तेव्हा जर कृपा करून थोडा उपहार केलात तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन.’

तिची ती प्रार्थना ऎकुन तो दृष्ट साधू जड अंत:करणाने खावयास बसला. पण त्याची नजर तिच्या मौल्यवान संपत्तीकडे होती. राजापेक्षाही अधिक ऎश्वर्य असणारी तिची संपत्त्ती लुटावी कशी याची चिंता त्याला लागून राहिली होती. भोजन झाल्यावर अत्तर-गुलाबाचा स्वीकार करून हुस्नबानुस आशीर्वाद देऊन साधुमहाराज तेथून बाहेर पडले.

त्या दिवशी हुस्नबानु आणि तिचे नोकरचाकर साधूच्या आदरातिथ्याने थकुन जाऊन गाढ झोपले होते. त्यांनी मौल्यवान वस्तुंची आवराआवर केली नव्हती. एवढेच तर त्या वाड्याचे दरवाजेही लावायचे राहून गेले होते.

तो दरोडेखोर साधू आपल्या शिष्यांसह मध्यरात्री वाड्यात आला. त्याने लगेच किमती वस्तु चोरण्याचा सपाटा चालविला. तेवढ्यात बानूचे काही नोकर जागे झाले व चोरांना प्रतिकाल करू लागले. परंतु त्यांच्यापैकी कांहीना ठार करून तर काहिंना जखमी करून साधुने संपत्ती लुटून नेलीच. त्याच्या या गोंधळाने हुस्नबानुस जाग आली व तिने त्या दुष्ट साधुची पापकर्मे स्वत: पाहिली. ज्याला आपण दैवी अंग मानला तो साधूच महा नीच कृत्ये करणारा आहे हे पहाताच बानूस अतिशय संताप आला. त्याचा नायनाट केलाच पाहिजे, म्हणुन जखमी नोकरांना घेऊन ती राजवाड्यात आली. प्रधानाने तिची हकीकत ऎकुन घेतली व ती राजास सांगून तो म्हणाला, ’महाराज! तुमच्या जिवलग मित्राची कन्या आपल्याला स्वत: हकीकत सांगण्याची परवानगी मागत आहे.’

राजाने त्याप्रमाणे बानूस बोलाविले तेव्हा घडलेली सर्व हकीकत सांगुन ती म्हणाली, ’खुदावंत! ज्याला आपण गुरु मानलेत त्याने विरक्‍तपणाचे सोंग घेऊन अशी भयंकर कृत्ये केली आहेत, तेव्हां योग्य न्याय करावा.’

Friday, March 11, 2011

हुस्नबानूची कथा

अति प्राचिनकाळी खुरासन प्रांतामध्ये एक लैकिकसंपन्न बादशहा राज्य करीत होता. त्याचे पदरी आठ प्रधान होते. ते कर्तव्यद्क्ष होते. इतर नोकर-चाकरसुद्धा आपले काम दक्षतेने करीत. बादशहाचे नाव होते, कर्दनशाह. कर्दनशाह इतका न्यायनिष्ठुर होता की, न्यायासनापुढे प्रत्यक्ष मुलाचीही तो पर्वा करीत नसे. प्रत्यक्ष राज्यात रहाणारा बरझाक नावाचा अत्यंत धनवान व उदार अंत:करणाचा सौदागर, राजाचा जिवलग मित्र होता. बरझाकला फक्‍त एकच कन्यारत्‍न होते, तिचे नाव हुस्नबानु.

काही काळाने मरणसमयी सौदागाराने राजास बोलावून आपली धनदौलत व कन्या हुस्नबानू त्याच्या ताब्यात दिली. मित्राच्या अफाट संपत्तीचा लोभ न धरता हुस्नबानू तारूण्यात आल्यावर राजाने सर्व संपत्ती तिच्या स्वाधीन केली. हुस्नबानू आपल्या दाईसमवेत पित्याच्या वाड्यात राहू लागली. हुस्नबानूची आई लहानपणीच वारली असल्याने ती दाईसच आई म्हणत असे. एके दिवशी हुस्नबानु दाईस म्हणाली, ’आई॒! हा संसार निरर्थक आहे. सारी धनदौलत गरिबांस वाटून अल्लांचे नामस्मरण करीतच जीवन सार्थकी लावावे असे मला वाटते. या बाबतीत तुझे मत काय आहे?’

ते बोलणे एकुण ती दाई मोठ्या प्रेमाने म्हणाली, ’हा वेडेपणा तु करू नकोस. एका साधुमहाराजांच्या कृपेने मला सात प्रश्न माहित आहेत. ते सर्व प्रश्न तू दरवाजावर लिहून ठेव. त्याची जो समाधानकारक उत्तरे देईल त्याच्याशी तू लग्न कर, म्हणजे तुझे जीवन सुखी व समाधानी होईल.

१) एक वेळ पाहिले आहे पुन्हा पहाण्याची इच्छा आहे.
(एक बार देखा है, दुसरी बार देखने की तमन्ना है)
२) चांगले कर आणि पाण्यावर टाक.
(नेकी कर और दरिया मे़ डाल)
३) कोणलाही दगा देऊ नकोस. देशील तर तशीच फळे भोगशील.
(बदी किसीसे न क्र अगर करेगा तो वही पावेगा)
४) खरे बोलणारा सदा सुखी असतो.
(सच कहनेवाला हमेशा खुशहाल होता है)
५) ’कोहनिदा’ असे आवाज कराणारा पर्वताची खबर आण.
(’कोहनिदा’ पहाड की खबर ला दे)
६) पाणकोंबडीच्या अंड्याएवढा एक मोती माझ्यापाशी आहे. त्याच्या जोडीला दुसरा घेऊन ये.
(वह मोती जो मुर्गाबी के अंडे के बराबर बिल फैल मौजुद है उसीकी जोडी पैदाकर दो)
७) हमामबाद गिर्दची बातमी आण.
(यह है कि हमामबाद गर्द की खबर ला दे)

दाईने सांगितलेले सातही प्रश्न ऎकल्यावर हुस्नबानु म्हणाली की, ’या प्रश्नांची उत्तरे देणारा ज्ञानसंन्न पुरूष सापडणे अत्यंत अवघड आहे व त्याप्रमाणे सापडल्यास त्याच्याशी विवाह करून मी सुखी होईन हे तरी कशावरून? तिचा प्रश्न ऎकुन त्या दाईने साधूची योग्यता सांगितली व त्याप्रमाणे आचरण केल्यास सुखप्राप्ती निश्चित होईल असा विश्वास तिच्या ठिकाणी निर्माण केला.

परोपकारी राजा हातिम

पूर्वी एकेकाली येमेनचा बादशहा तई याने खूप वर्ष राज्य केले. आपल्या अलकिरससा नावाच्या चुलत्याच्या कन्येशी विवाह केला. पूढे ब-याच दिवसांनी त्यांना एक सुंदर मुलगा झाला. त्यावेळी बादशहाला अतिशय आनंद झाला. त्याने आनेक पंडितांना बोलावून म्हटले की, ’आपल्या पंचांगात पाहुन याचे अचूक भविष्य सांगा.’ त्या सर्व विद्वानांनी त्याची पत्रिका तयार केली व ती पाहिल्यावर बादशहास सांगितले की, ’खुदावंत! आमच्या मते हा राजपुत्र बादशहा तर होईलच, पण त्याशिवाय तो आपले सारे आयुष्य परोपकारात घालवून पुण्यसंचय करील. प्रत्यक्ष विधात्याचेच कार्य केल्यामुळे याचा किर्तीरूपी सुगंध आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत चोहीकडे दरवळत राहील.’ हे ऎकुन बादशहा एकदम खूश झाला. त्याने ह्या लोकांना खूप जडजवाहीर व मोहरा देऊन निरोप दिला.

नंतर त्या मुलाचे मोठ्या थाटाने ’हातिम’ असे नांव ठेवून त्याने आपल्या सरदारांना आज्ञा केली की, ’ तुम्ही सगळीकडे दवंडी जाहीर करा की, ’ माझ्या राज्यात आज ज्यांच्या कुटुंबात मुलगा जन्माला आला असेल तो आजपासून बादशहाचा नोकर आहे. त्याच्या मातापित्यांनी त्याला इकडे पोहोचते करावे. मुलाचे लालनपालन येथेच केले जाईल.’ बादशहाचा हूकूम ऎकताच प्रत्येकाच्या आईवडिलांनी आपापला मुलगा हुजुरांकडे पोहोचता केला, त्या दिवशी राज्यात सहा हजार मुलगे जन्माला आले होते. नंतर त्या सर्व मुलांसाठी सहा हजार दाया व नोकरचाकर ठेवले गेले. त्या मुलांपैकी एकावर सर्वांचे विशेष लक्ष होते, तो म्हणजे हातिम. त्याला अनेक दाया जपत व अनेक प्रकारांनी खेळवत असत. एवढे करूनही तो मुलगा डोळे उघडेना किंवा दूधसुद्धा घेईना.

तो प्रकार पाहून बादशहा बुचकळ्यात पडला व त्याने सरदारांना हुकुम सोडला की, ’ पंडितांना ह्याचे कारण विचारा.’ ते ऎकल्यावर पंडितांनी सांगितले की, ’सर्व मुलांचे दूध पिऊन झाल्यावर हा दूध पिईल.’ त्याप्रमाणे सर्व मुलांना दूध पाजल्यावर तो प्याला. पुढे त्या सहा हजार मुलांबरोबर त्याचे जेवणखाणे होऊ लागले.

जेव्हा तो १४ वर्षाचा झाला तेव्हा त्याने बापाची संपत्ती गोरगरिबांस वाटून टाकली. त्याने कधीही कोणावर जुलूम केला नाही. आपले नुकसान करून घेतले नाही किंवा दूस-याचेही केले नाही. पुढे तारूण्य प्राप्त झाल्यावर तो इतरांना उपदेश करू लागला की, ’ही सर्व सुष्टी ईश्वराने निर्माण केली. त्याच्या कारागिरीनी चौ-याशी लाख विश्व निर्माण केली आहेत. त्याच्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या कर्तुत्वाने पुढे यावे.’ लवकरच त्याचे लावण्य, शौर्य बुद्धिमत्ता, परोपकारी वृत्ती यांची किर्त्ती वा-यासारखी सगळीकडे पसरली.

एकदा तो जंगलात शिकारीसाठी गेला असता एक सिंह त्याच्या अंगावर गुरगुरताना दिसला. तेव्हा त्याने मनात विचार केला की, ’मी खंजीर मारला तर तो घायाळ होईल. सोडून दिले तर माझा प्राण घेईल. पण मग ह्याचा आत्मा तरी कसा शांत होईल?’ शेवटी तो स्वत:च सिंहापूढे उभा राहून म्हणाला, ’हे वनराजा! मी व माझा घोडा तुझ्यासमोर हजर आहोत. तुला आवडेल त्याला खाऊन तू तृप्त हो.’ ते ऎकुन तो सिंहराज आपली गर्दन झुकवुन हातिमच्या पायांवर पडला आणि डोके त्याच्या पायांवर चोळू लागला. त्याचे पाय चाटू लागला. तेव्हा हातिमने त्याला पुन्हा सांगितले की, ’ मला खात नसशील तर माझ्या घोड्याला खा.’ पण सिंह काही न करता मान खाली घालून तेथून निघून गेला. अशा प्रकारे हातिम सर्वांसाठी झटत होता. परोपकारासाठी आपले आयुष्य वेचित होता.

हातीमताई

हुस्नबानूच्या सात प्रश्नांची उत्तरे देणारा तई राजाचा पुत्र हातीम याच्या सत्यप्रिय, त्यागी, परोपकारी, साहसी जीवनाची मनोवेधक, अदभुतरम्य, सुरस, बोधप्रद, वाचनीय कथा.

पुस्तकाचे नाव - हातिमताई
लेखक - श्री प्रभाकर नारायण तुंगार
प्रकाशन - सेंट्रल प्रकाशन

Wednesday, March 9, 2011

बंडूला पहिले बक्षीस

अण्णांचा बंडू म्हणजे मुलखाचा बावळट...! अभ्यासात ’ढ’ अक्षर ’कीडामु़गी’ आणि ड्रॉईग तर विचारूच नका! त्यामुळे शाळेच्या स्नेहसम्मेलनातील प्रदर्शनात बंडू कोणतीही वस्तु ठेवू शकत नसे. दुस-या मुलांना छान-छान पारितोषिके मिळत. ती मुले बंडूला हिणवीत, चिडवीत. तो बिचारा दातांनी नखे कुरतडत, सारखा त्यांच्याकडे पाहत उभा राही.

यावर्षी मात्र बंडूने मनाशी निश्चय केला की कसेही करून एकतरी बक्षीस पटकवायचेच! पक्का निश्चय केल्यामुळे आपोआपच त्याला बुद्धी सुचली आणि -

ड्रॉईग मास्तर प्रदर्शनाच्या दालनात वस्तु मांडीत होते. तेथे तो हिंमतीने गेला. दोघांचे काही बोलणे झाले. बंडू बाहेर निघाला तेव्हा त्याचा चेहरा प्रफुल्लित दिसत होता. स्नेहसंमेल्न झाले, प्रदर्शनाचे उद्घाटन आणि परीक्षणही आटोपले. दुसरे दिवशी बक्षीस समारंभ होणार होता. त्या दिवशी ’एकेकाचा छंद’ ह्या संग्रह विभागातले पहिले बक्षीस ’अज्ञाताचा छंद’ या वहीला प्राप्त झाले. हा ’अज्ञात’ कोण? मुलांना प्रश्न पडला. अखेर मास्तरांनी गुपित फोडले. ती वही बंडुची होती.

कुणी तिकिटे जमवली होती, कोणी फोटोचा संग्रह ठेवला होता. कुणाचा विविध गाण्यांचा संग्रह होता. अशा निरनिराळ्या वस्तुंच्या मेळाव्यात बंडूच्या वहीलाच पहिले बक्षीस कसे मिळाले? वहीत काय होते?
मुळ कल्पना मास्तरांची होती. बंडूच्या घरी अनेक साप्ताहिके नि वर्तमानपत्रे असलेल्या गोष्टी त्यांच्या रम्य चौकटीसहित बंडूने कापल्या व जाड रंगी-बेरंगी कागदांच्या एका वहीत नीट चिकटविल्या. सुमारे तीस-चाळीस सुंदर सचित्र बालकथाचे ते एक पुस्तकच झाले. तांबड्या-निळ्या पेन्सिलीने बंडूने गोष्टींच्या चौक्टीभोवती रेषा काढल्या. मास्तरांनी वहीवर टपो-या अक्षरात नाव लिहून दिले - ’अज्ञाताचा छंद’ !

ही नाविन्यपूर्ण कल्पना परीक्षणकत्याना फार आवडली आणि बंडूला बक्षीस मिळाले. बक्षिसाचे पुस्तक घेताना बंडूच्या मुखमंडलावर प्रसन्नता झळकत होती. तो बावळटही दिसत नव्हता.

’निश्चयाने बळ, तुका म्हणे तोचि फळ.’